रामाने रावणास मारले
या वाक्यात मारले हे क्रियापद कशासाठी शिकवित होते गुरुजी
पुढे एकदा तर
रावणाने सीतेचे अपहरण केले हेच गुरुजी पुन्हा पुन्हा सांगत राहीले
बाईचे आणि मायीचे अपहरण करताना काहीच का वाटले नाही कुणाला ?
कधीतरी गुरुजी रंगात येवून महाभारतावर बोलत होते
द्रौपदी वस्ञहरणाचा प्रसंग रंगवून रंगवून सांगत होते
द्रौपदीचे वस्ञहरण करताना कौरवांना लाज का वाटली नसेल ?
पांडव वाट पहात होते का वस्ञहरणानंतरच्या द्रौपदीची ?
पाणिपतात लाखो बांगडी टिचली असे इतिहासाचे शिक्षक म्हणाले
त्या विधवांचे लग्न करायला काय हरकत होती ?
नवे मानवी संसाधन त्यातून जन्माला आले नसते का ?
युध्दात पहीला बळी जातो बाईचा
तिचे अपहरण , स्वामित्व , उपभोग
जेत्यांचा हा कोणता अधिकार ?
आमचे युध्दाचे अभ्यासक्रम कोण विकसित करतो ?
आम्हाला युध्दसज्जतेचा पाठ कोण शिकवतो ?
पुढे होणा-या युध्दाची कोण तयारी करुन घेतो ?
शंकर बो-हाडे
No comments:
Post a Comment