आठव
====
साहित्य आणि संस्कृतीचा यांचा सेतू एकच . साहित्यातून संसकृतीचेच दर्शन घडते.नाशिकला पुण्यापाठोपाठ सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते . दादासाहेब फाळके हे चिञ महर्षी तर कवी कुसुमाग्रज हे साहित्य महर्षी . कानेटकरांनी मराठी नाटक समृध्द केले . बाबुराव बागुलांनी दलितांच्या जीवनाला कथेतून अविष्कृत केले . वामनदादा कर्डकांनी डाॅ आंबेडकरांच्या किर्तीचे पोवाडे गायले . पुढच्या पिढीत अनेकांनी ही साहित्यदिंडी आपल्या खांद्यावरून वाहून नेली . आता मराठीत नवी पिढी लिहू लागली आहे .तरी जुन्यांचा आठव होतोच .
नाशिकचा पोवाडा लिहीणारे बी . डी . जाधव कामगार क्षेञात रमले . परिस्थितीचे ओझे खांद्यावर घेतलेला हा कलावंत साहित्याच्या प्रांतातून दूर गेला . अ. वा. वर्टी हे विनोदी कथाकार . नाशिकचा साहित्य मेळावा त्यांच्यामुळे हसरा , ताजातवाना असायचा . माधव मनोहर हे समीक्षक . ते मुंबईत रमले . त्यांचा एक पाय नाशिकमध्ये होता .नाटकांची समीक्षा त्यांनी व्रतस्थपणे कली . वसंत नरहर फेणे यानी कथा आणि कादंबरीच्या क्षेञात मौलिक कामगिरी केली . त्यांची सेंट्रल बस स्टेशन ही नाशिकच्या सीबीएस वरच्या घडामोडी टिपणारी कादंबरी . शिवाजी तुपे हे चिञकार . नाशिकचा गंगाघाट , जुनं नाशिक ही त्यांच्या चिञांची समृध्दी . ते लिहीतही होते . लेखकात मिसळतही होते .चंद्रकांत वर्तक हे कथाकार . त्यांनी ललित लेखनही केले . साहित्य चर्चेत त्यांचे विचारमंथन सतत चालू असायचे . वळणावरचे साकव हा त्यांचा महत्वाचा कथासंग्रह . मो ग तपस्वी उत्तरायुष्यात नाशिकमध्येच स्थिरावले . पञकार असणारे तपस्वी नाशिकच्या सांस्कृतिक घडामोडीत सामिल होत . बा वा दातार हे महत्वाचे व्यक्तीमत्व . विनोदी साहित्यावर संशोधन केलेल्या दातार सरांनी दोन तात्या हा ग्रंथ लिहीला .अभिनव भारताचे साक्षिदार असणा-या बा वा दातारांना तात्याराव सावरकर महत्वाचे वाटत होते आणि तात्यासाहेब शिरवाडकरही महत्वाचे वाटत होते . पसन्न निर्मळ माणूस असणारे दातारसरांची आजही आठवण होते . पञकार सुरेश अवधूत यांनी भरारी , झेप असे स्तंभलेखन केले . संपादकांची मोठी परंपरा नाशिकमध्ये आहे . माधव गडकरी हे निफाडकर . काही काळ ते निफाडमध्ये रमलेही . त्यांचे लेखन विविधांगी होते . साहित्यातील माणिकमोती हे त्यांचे व्यक्तिचिञांचे पुस्तक . त्यांचे संपादकीय लेखनही ग्रंथबध्द झाले आहे . पञमहर्षी द . शं . पोतनीस , शशिकांत टेंभे या संपादकांनीही आपले योगदान दिले आहे . लेखकांना घडवणारे हे संपादक नाशिकच्या सांस्कृतिक विश्वाचे आधारवड होते . राजीव पाटील हा उमदा दिग्दर्शक . त्याचे जोगवा , सावरखेड एक गाव , सनईचौघडे हे महत्वाचे चिञपट होते . राजीव पाटीलची आई आशाताई पाटील या उत्तम वक्त्या , सूञसंचालक . त्यांचा मधला मुलगा प्रशांत पाटील हा अभिनेता . संस्कृतीची सेवा या कुटुंबाने केली .
कवी आनंद जोर्वेकर हा उमदा कवी ." थोडे शब्द थोडी गाणी , हेच माझे अन्नपाणी " ही त्याची भूमिका होती . निजरूप हा त्याचा कविता संग्रह . पुढे त्याचा " काहीलिचे पाणी " हा कवितांचा संग्रह आला . विशुध्द कविता आणि विशुध्द कवी म्हणजे आनंद जोर्वेकर तथा प्रमोद कुलकर्णी . त्याच पिढीतला पण वेगळया कुळातला कवी म्हणजे अरूण काळे . राॅकगार्डन , सायरनचे शहर या कविता संग्रहानंतर त्याचा नंतर आलेले लोक हा संग्रह प्रसिध्द झाला . जागतिकीकरणानंतरची परीभाषा , लोकभाषा अरूण काळे यांनी मांडली . दलित कवितेला नवे परिमाण या कवीने दिले . उपेक्षित , शोषित , वंचित , दलित समाजाची कुतरओढ या कवीने मांडली . कैलास पगारे हा त्याचा समकालिन कवी . सर्व्हे हा त्याचा पहिला संग्रह साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानाने आला . त्या नंतर या ही मोसमात हा त्याचा संग्रह प्रसिध्द झाला . दीर्घ विरामानंतर त्याचा मल्टीनॅशनल वाॅर हा कविता संग्रह प्रसिध्द झाला . दलित कवितेच्या प्रवाहात त्याने समर्थपणे आपले योगदान दिले . त्याचा माणूसनामा हा संग्रह याच वर्षी प्रसिध्द झाला . अरूण काळे आणि कैलास पगारे यांनी मानवी मूल्यांसाठी कविता लिहीली . अक्षर सुधारण्यासाठी कुणी कविता लिहीत नसते ,ही या कविंची भूमिका होती . जयश्री पाठक ही कवयञी आणि कवीची सखी . कवितेचे विविध कार्यक्रम करणा-या जयश्री पाठक यांनी बालकविताही लिहिल्या . पण कवीला जगण्याला चाल लावता येत नाही हे अरूण काळेने सांगितलेले सूञ जयश्री पाठकांनाही लागू पडले .
आज हे कवी , चिञकार , पञकार , नाटककार , नट , दिग्दर्शक आपल्यात नाहीत . पण साहित्य संस्कृतीची त्यांनी सेवा कली . काहींना दीर्घायुष्य लाभले . काहींची अचानक एक्झिट झाली . चटका लावणारं मरण काहींना अनुभवाला आले .ही माणसं लाखमोलाची होती म्हणून नव्या वर्षाला सामोरे जाताना त्यांचा आठव महत्वाचा ठरतो .
No comments:
Post a Comment