Thursday, 21 January 2016

                                        पॅट्रयाटीक गाईड
                                        ==========
अंदमानच्या राॅस आयलंड बेटावर टूरिस्ट कंपनीने एक गाईड बोलावली होती .तिचे नाव अनुराधा राव . प्रथम दर्शनी तिच्या विषयी कुतूहल वाटत नाही . तरी तीने दंडात घातलेल्या  पितळी देवदेवतांच्या मूर्तीवरून हे रसायनवेगळे असल्याचे  लक्षात येते . अनुराधा राव बंगाली स्ञी . तिच्या चार पिढ्या अंदमान बेटावर गेल्या . एकञित कुटुंब होते. ते आज राहीले नाही. अंदमानातील 572 बेटांपैकी आज अनेक बेटं भूकंप , सुनामी मध्ये नष्ट झाली .
अनुराधा राव ही राॅस आयलंड बेटावरची खाजगी गाईड असली तरी कोरडी ,, तांञिक माहिती सांगत नाही . तिच्या बोलण्यात या बेटांचा इतिहास , भूगोल तर असतोच पण त्याहून अधिक करुणा असते . ब्रिटशांनी पॅरिस ऑफ द ईस्ट अशी उपमा देऊन हे बेट विकसित केले . तिथे चर्च  होता . आयुक्तांचे निवासस्थान होते. सैनिकांची रहाण्याची व्यवस्था होती . बेकरी होती. राॅस आयलंड बेट म्हणजे ब्रिटीशांची श्रीमंती होती .अनुराधाच्या चार पिढया या बेटाशी संबधित आहेत . एका पिढीने दुस-या महायुध्दात या बेटांना बसलेली झळ पाहीली . राॅस आयलंड बेटावरच स्मशानभूमी उभारावी लागली , दुस-या महायुध्दात जपानी फौजांनी केलेल्या बाॅम्ब हल्ल्यात राॅस आयलंड बरोबरच सेल्युलर जेलचेही नुकसान केले . जेलच्या काही विंग पडल्या . काळयापाण्यासाठी प्रसिध्द असणा-या जेलची अवस्था केविलवाणी करून टाकली . तीन वर्षे इथे जपानचा ताबा होता . 2004 च्या तत्सुनामीच्या लाटांनीही या बेटांना तडाखा दिला . ही करुण कहानी अनुराधा सांगते तेंव्हा एक गाईड बोलतोय असे वाटत नाही . एखादया साक्षीदाराची करुणेनं भरलेली कैफीयत ऐकत आहोत असे वाटत रहाते .
          अनुराधा राव स्वातंञ्यवीर सावरकरांविषयी म्हणते , ऐसा सच्चा देशभक्त न आज होगा ,न कल होनेवाला है ! पुढे सावरकरांनी भिंतीवर लिहीलेल्या कमला या खंडकाव्याचा दाखलाही देते .सेल्युलर जेलमधल्या छळ छावणीचं वर्णन करता करता तिचा कल्पनाविलासही बहराला येतो . सावरकरांनी भिंतीचा कागद बनवण्यासाठी भाताच्या कन्यांनी भिंत सारवली . सावरकरांच्या कोठीसमोर एक बुलबुल येऊन सावरकरांना रिझवायची .तेंव्हा सारवलेल्या भिंतीवर पाणी शिंपडून सावरकर ते भिंतीचे पोपडे ( भाताचे कण ) तिच्या पुढे टाकत . हा कल्पनाविलास ऐकून नवल वाटत रहाते .
          अनुराधाचे रूप बावळे . तिच्या खाद्यावर एक पिशवी असते . पुरूषी मॅनेला , ढगळ पॅट घातलेल्या अनुराधाच्या खिशात एक खारूताईचे पिल्लू असते . ती आता इथल्या  पक्ष्यांविषयी , प्राण्याविषयी , झाडाफुलाविषयी बोलू लागते . जपानच्या हल्ल्यात आणि तत्सुनामीच्या तडाख्यात भग्न झालेल्या वास्तूविषयी बोलू लागते . एका झाडाखाली उभे राहून राॅस बेटावरील पक्ष्यांची ओळख करून देताना ती त्या पक्ष्यांशीच बोलू लागते . खांदयावरच्या पिशवीतून ती बोलता बोलता ब्रेडचे तुकडे भिरकावते आणि बघता बघता त्या विशिष्ट पक्ष्यांचा किलबिलाट होतो . तिचा आवाज ऐकून मोरांचा थवाही येतो . ती त्यांनाही खायला देते . मग हळूच एक दोन ससेही  येतात . ती सतत बोलत रहाते . मै तो ऐसीही फास्ट बोलती रहती हू म्हणत तीचा आवाज ऐकूण चार दोन हरणंही येतात . ती त्यांनाही खायला घालते .  मग एक विस्तिर्ण झाडाजवळ येऊन त्या पाचशे वर्ष जुन्या झाडाची माहिती देते . राॅस बेटाची तत्सुनामीने कशी अवस्था केली त्याचं वर्णनही करते . बाजूला बुडाजवळ झाडांना आलेला वक्र ती दाखवते . 572 बेटांचा हा समुह पण त्यातली अनेक बेटं भुकंप , तत्सुनामीने गिळंकृत केली आहेत . छ्तीस बेटांवर मानवी वस्ती आहे . पुढील पन्नास वर्षात प्राकृतिक बदल होऊन मानवी वस्तीला त्याची झळ बसेल असेही बोलले जात आहे . अनुराधा राव या बेटांना घट्ट चिकटून आहे . ती नुसती बोलत रहाते . तिला प्राण्यांचा स्वभाव , त्यांची दुखणी कळतात . एका काळया सशाला बिस्कीट टाकल्यावर ती म्हणते , त्याला असं खायला घालू नका . तो आजारी आहे . त्याला औषध चालू आहे . एका हरणाला खायला दिल्यावर ती म्हणते , त्याच्यापासून दूर रहा . तो बदमाश आहे .
          अनुराधा राव प्रायव्हेट गाईडचे काम करुन उपजिविका चालविते .ती म्हणते, मला बाॅयफ्रेंड नाही . हे बेट , त्यावरचे पशुपक्षी , झाडं , फुलं हेच माझे सोयरे आहेत . ती मिळालेल्या पैश्यातून पशुपक्ष्यांसाठी मुक्त हस्ते उधळण करते . रिकाम्या वेळेत तिचा पशुपक्ष्यांशी संवाद चालू असतो . एकदा एक लष्करी अधिकारी राॅस बेटाला भेट देण्यासाठी आला . पर्यटक नसल्याने अनुराधा पशुपक्ष्यांशी संवाद करत बेटावर फिरत होती . त्याने अनुराधाला पाहीले . आपल्या अहवालात " इथे पशुपक्षी प्राण्यांबरोबरच वेडीही पहायला मिळाली " अशी नोंद केली . अनुराधाला हे एका अधिका-याने सांगितले पण तिला त्याविषयी ना खेद वाटला , ना खंत . ती अतिशय संवेदनशील स्ञी आहे . राॅस बेटाची सफर करताना ती  पर्यटकांना उद्देशून म्हणाली , माझं एक ऐकाल ? आपण गावाकडं गेल्यावर गावाजवळ असणारा वृध्दाश्रम काढून फेकून द्या . आपल्याला दुनिया दाखवली ते आईबाप आपले ईश्वर आहेत . तुम्हाला प्रथम आईने जन्म दिला . देव दाखवला . धर्म शिकवला . त्या देवाना वृध्दाश्रमात ठेवणं पाप आहे . माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे . आपल्या आजूबाजूचे वृध्दाश्रम काढून फेका .अनुराधाच्या आवाजातील कारुण्याने डोळे भरुण येतात .
              अनुराधाला तिच्या लाघवी स्वभावामुळे , करुणमयी भाषेमुळे फॅनही भरपूर आहेत . कुणी तिच्यानावे गुगलवर पेजही सुरु केले आहे . कुणी आपल्याकडे येण्याचे निमंञणही पाठवतात . कुणी तिला खरोखर विमानाची तिकीटही पाठवतात . ती कशालाही दाद देत नाही . विमानाचे तिकीट रद्द करून ती पैसे परत पाठवून देते . आम्ही तिला भेटलो . तिला ऐकलं आणि प्रेमातच पडलो .ती फक्त कोरडी तांञिक माहीती सांगणारी गाईड नाही . तीला पॅट्राॅटीक गाईड म्हणावे लागते .
नटसम्राट नाटकात एक संवाद आहे , म्हातारपण हे दुसरे बालपण असतं . त्यावेळी गणपतराव बेलवलकरांची मुलगी म्हणते ,या बालपणाला आई आणायची कुठून ? म्हातारपणात बायको ही त्याची काठी असते . पण तिलाही वृध्दापकाळ सुसहाय्य असला पाहीजे . दोन पिढ्यात अंतर निर्माण होते . त्यांच्यात ठकराव निर्माण होतो . ते टाळता येऊ शकते . ज्येष्ठांना ते सहज शक्य आहे . त्यासाठी भूतकाळाला चिकटून बसून चालत नाही .मी पूर्वी कोण होतो हे विसरावे लागते . अहंकाराचा वारा न लगे माझ्या राजसा , असे संतांनी सांगून ठेवले आहे . सेकंड इनिंग सुरू होते तेंव्हा कॅप्टन बदलला आहे , हे लक्षात घेऊन  आपण वाटचाल केली तर जगण्यातही मजा येऊ शकते . माझे एक मिञ आहेत . पस्तीस वर्षे सेवा करून निवृत्त झाले . आयुष्यातला अर्धाकाळ चाकरमानी शिक्षक असलेल्या मिञांनी पुढच्या महीनाभरात घर डोक्यावर घेतले . मी रिटायर झालो असं समजू नका ? स्वयंपाक उशिरा का केला ? अशी व्यर्थ बडबड सर करू लागले .सुनांना सासरा राक्षस वाटायला लागला . मग मी मिञवर्यांचे समुपदेशन केले . म्हातारपण समजाऊन घेतले की आनंदाचे क्षण वाटयाला यायला वेळ लागणार नाही .
          पंढरीनाथ कुलकर्णी नावाचे काका होते . साने गुरूजींचा प्रभाव असणा-या काकांनी व्यक्तीमत्व विकास मंच ही संस्था सुरू केली . शाळा शाळांमध्ये वाचन संसस्कृती वाढविण्याचा प्रयत्न केले . दिवाळीला त्यांनी गरीब मुलांच्या घरात पणत्या पेटवल्या . काकांचा वृध्दापकाळ सुसह्य आणि समृध्द गेला . म्हातारपणात घरात अडथळा होण्यापेक्षा अंधारात पणत्या पेटवणा-या काकांची आजही मला आठवण येते .
          ज्येष्ठांनी आपल्या दुस-या बालपणात नातवंडांना वेळ द्यायला हवा . नातवंडांसाठी खेळा , हसा , नाचा . एकाच जागी बसणं , थांबण हे कंटाळवाणं असतं . या वेळी जोडीदारासह फिरण्यात मजा असते . एका मुलाकडे आहात . दुसरा असेल तर त्याच्याकडेही काही काळ रहा . दोन मुलात त्यामुळे दरी निर्माण होत नाही . आपल्याला मुलगी असेल तर तिलाही वेळ द्या . एका खांद्यावर भार टाकण्यापेक्षा हा भार हलका करता येईल . भटकायची आवड असेल तर जुन्या मिञाची जरूर आठवण करा . थकवा आणि कंटाळा येणार नाही . शक्यच असेल तर पर्यटन करायलाही हरकत नाही . पण एकाच जागी राहून  तुमच्या वाटयाला तेच तेच आयुष्य येईल .
             म्हातारपणात औषधांची सोबत काहींना करावी लागते . खाण्यापिण्याच्या , औषधाच्या वेळा पाळल्यातर छान दिवस जातात . काही मिञ मला काय होतय या समजूतीत गाफील रहातात . हे गाफीलपण अंगावर आणि जीवावर बेतू शकतं . डाॅक्टरांचा सल्ला माना . डाॅ अप्पासाहेब पवार हे नामवंत स्ञीरोग तज्ञ . त्यांना थोडी शंका येताच ते एका तरूण डाॅक्टरला भेटले . सल्ला घेतला .तपासण्या केल्या . नियमित औषधे घेऊन डाॅ अप्पासाहेब पवार वयाच्या ऐंशीनंतरही निरोगी निरामय आयुष्य जगत आहेत . अप्पासाहेबांनी या काळात आपली आत्मकथाही लिहीली .  " अविश्रांत मी " ही त्यांची आतमकथा ज्येष्ठांना प्रेरणा देणारी आहे . मला वाटतं प्रत्येकाचे आयुष्य ही एक कादंबरी असते . त्यात जीवनाचे नाट्यही भरलेले असते . तुमच्या आयुष्याची पानं पुढच्या पिढ्यांसाठी जरूर उघडी करा . "आमचा बाप आन् आम्ही " हे डाॅ नरेंद्र जाधवांचे पुस्तक बापाने वृध्दापकाळात लिहीलेल्या  पाचपंचविस पानातूनच  विकसित झाले आहे . आठवणी जागवत जागवत स्वतःला शोधताना मजा येते . हातात लेखनी घ्या . सारे गुपित सांगून टाका . आपल्या बापाने काय काय सोसले , आपल्या आईला कसे कसे चटके बसले ते सांगायला काय हरकत आहे . चंद्रकांत महामिने यांनीही वयाची ऐंशी
पूर्ण केली आहे , पण महामिने दिसा माजी काही लिहीत रहावे या न्यायाने आजही दिवाळी अंकासाठी लिहीत आहेत . ज्ञानेश सोनारांची व्यंगचिञ आणि चिञकला आजही वयाचा बाऊ न करता सुरू आहे . मग ज्येष्ठतेने गारठण्याचे कारण नाही .
                 विरंगुळयाच्या अनेक गोष्टी आहेत . एखाद्या गरीब मुलाची शाळेची फी भरून बघा . कितीतरी आनंद घेता येईल . कुंभमेळयात काही शिक्षकांनी " रघुपती राघव राजाराम - शिक्षणासाठी द्याहो दान  " म्हणत एक उपक्रम राबविला . त्यात दोन तरुण आघाडीवर होते .  यु .के . अहीरे आणि अशोक पाटील . दोघही मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले . साठी ओलांडलेल्या या तरुणांची ऊर्जा पाहून अचंबा वाटतो . ज्येष्ठांनी स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठीही जगायला हरकत नाही . सृष्टीतल्या आणि मानवी संबधातल्या अनेक गोष्टी खूप आनंद देणा-या आहेत .
                   ज्येष्ठ नागरिकांनी वयाचं भय का बाळगावं ? मृत्यूचं भय का बाळगावं ? मृत्यू तर शाश्वत आहे . त्याऐवजी सप्रेम द्या निरोप , बहरून जात आहे , असं म्हणतं सगळयांचा निरोप घेण्याची मानसिकता ठेवावी , असं मला वाटतं . तुम्हाला काय वाटतं ?
साहित्य संमेलन की अकारण वादाचे आकांडतांडव
================================


साहित्यिकांचे संमेलन म्हणजे काव्यगायन, परस्पर प्रशंसा नाहीतर अकारण वादाचे आकांडतांडव आणि उथळ विचारांची खैरात असा प्रकार झाला असल्यामुळे , संमेलनातून भरीव कार्यनिष्पत्ती होत नाही याचे आश्चर्य करावयास नको .
जागृतिकार पाळेकर
सहा जानेवारी 1945

धुळे येथे 1945 मध्ये भा वि वरेरकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या साहित्य संमेलनावरची ही प्रतिक्रीया सत्तर वर्षानंतर भरणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनांना आजही लागू पडते . तत्कालीन महनीय व्यक्तिंनी अध्यक्षस्थान भूषविल्याने अध्यक्षीय भाषणांना एक दर्जा तरी होता .बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ग. ञ्यं. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे प्रतिपादन अत्यंत तळमळीने केले होते . तरी विदर्भ साहित्य संघाच्या रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनास या , असा वि. भि. कोलते यांनी आग्रह केल्यावर भाऊसाहेब माडखोलकर म्हणाले होते , " मी मुळीच येणार नाही . तुमचे संमेलन होणार म्हणजे काय होणार ? तोच अश्लिल वाऽमयाचा प्रश्न , कला की जीवन या संबधीची चर्चा , काव्यगायन आणि काही कंटाळी स्वरूपाचे ठराव , हेच की नाही? असल्या कामात खर्च करायला माझ्याजवळ मुळीच वेळ नाही. मी संमेलनाला मुळीच येणार नाही . "  (अजुनि चालतोची वाट )संमेलनाचे विषय साठोत्तरी , नव्वदोत्तरी झाले . बाकीचे सर्व सवंगपणे चालू आहे . या महामराठी उत्सवाचे  आकडे माञ कोटीच्या घरात गेले आहेत .
              मंञी , लोकनेत्यांची संमेलनातील उपस्थिती हा अलिकडचा लाडका विषय . पण राज्यसत्तेचा आर्थिक आधार मागायचा आणि मंञ्यांची टवाळी करायची  हे दिवस कालबाहय झाले आहेत . महाराष्ट्रात पुरस्कार वापसीला कसा प्रतिसाद मिळाला हे आपण पाहिले आहे . उत्सवप्रियता हे मराठी माणसाचे लक्षण लक्षात घेतले तर संमेलने संपन्न होत रहाणार आणि त्याविषयीच्या उथळ चर्चाही होत रहाणार . माध्यमांचा विस्तार झाल्याने ते अटळ आहे .  नगरचे संमेलन गाजले ते निषेधाचा ठराव करणार की नाही , या विषयावरून . नाशिकचे संमेलन लक्षात राहीले बोकड बळी दिला की नाही ? या अप्रस्तुत मुद्यावरून . ठाण्याचे संमेलन चर्चेत आले नथुरामच्या मुद्यावरून . चिपळूनच्या संमेलनात दिंडीवरून चर्चा झाली . सासवडला म्हणे अध्यक्षांनी भाषणाच्या प्रतीच भिरकावल्या . असाहित्यिक मुद्यावरूनच साहित्य संमेलने लक्षात रहातात .पिंपरी चिंचवडचे संमेलनच रद्द करा इथ पर्यत चर्चा आली आहे .
             मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर काही महत्वपूर्ण विषयाची चर्चा व्हावी , अशी अपेक्षा असते . अध्यक्षांचे भाषण हे या दृष्टीने दिशादर्शक ठरावे . पण मागील काही संमेलनांच्या अध्यक्षीय भाषणांकडे नजर टाकल्यास सगळीच आबाळ दिसून येते . अध्यक्षीय भाषणात साहित्य व्यवहार व साहित्य विचारावर , समाजविचारावर चर्चा होणे अपेक्षित असते . पण तसे घडत नाही . निवडून येताना झालेल्या दमछाकीचेच प्रतिबिंब भाषणात पडते . सर्वांनाच सांभाळून घेण्याची भूमिका असते . हम भले , तुम भले , सब भले पध्दतीने काही विचार परंपरा , साहित्य प्रवाह , नवा लेखक , नवे समाज वास्तव यावर भाष्य अथवा समीक्षात्मक मांडणी काही होत नाही . काहींनी तसा प्रयत्न केला तर तो समजून घेतला जात नाही . कराडच्या साहित्य संमेलनाचे उदघाटक होते माजी पंतप्रधान नरसिंहराव . त्यांनी अस्खलीत मरठीत भाषण करताना भरताच्या रससिध्दांता पलिकडे आपण फार प्रगती केली नाही असे स्पष्ट करून भारतीय साहित्य परंपरेतील मराठी साहित्याच्याही वाटचालीचा धांडोळा घेतला होता . ते भाषण खूपच गाजले . घुमानला संमेलनाध्यक्षांना फार अवकाश मिळाला नाही . तरी डाॅ सदानंद मोरे यांनी संत साहित्याच्या पृष्ठ भूमीवर पंडीती साहित्याच्या परंपरेवर नेमके प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते . पण ते भाषण कुणी फार गांभिर्याने घेतले नाही की त्याची समीक्षाही झाली नाही .
               साहित्य संमेलनाचा सोहळा संपन्न होईल . तो होऊ द्या . पण विचार परंपरांची प्रगती त्यात दिसू द्या . अन्यथा अध्यक्षीय भाषणांचे वैभवशाली दिवस इतिहास जमा होवून साहित्य जञा भरली आणि सरली अशीच नोंद पिंपरी चिंचवडच्या साहित्य संमेलनाची नोंद इतिहासात होईल आणि एक विक्षिप्त माणूस वलयांकित झाला असे म्हटले जाईल . तसे होऊ नये , महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन तिथे घडावे . अन्यथा जागृतिकार पाळेकरांनी म्हटल्याप्रमाणे , अकारण वादाचे आकांडतांडव आणि उथळ विचारांची खैरात यामुळेच हे संमेलनही लक्षात राहील .

Saturday, 16 January 2016

साहित्य संमेलनाची सबनीस संस्कृती


आठव


आठव
====

साहित्य आणि संस्कृतीचा यांचा सेतू एकच . साहित्यातून संसकृतीचेच दर्शन घडते.नाशिकला पुण्यापाठोपाठ सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते . दादासाहेब फाळके हे चिञ महर्षी तर कवी कुसुमाग्रज हे साहित्य महर्षी . कानेटकरांनी मराठी नाटक समृध्द केले . बाबुराव बागुलांनी दलितांच्या जीवनाला कथेतून अविष्कृत केले . वामनदादा कर्डकांनी डाॅ आंबेडकरांच्या किर्तीचे पोवाडे गायले . पुढच्या पिढीत अनेकांनी ही साहित्यदिंडी आपल्या खांद्यावरून वाहून नेली . आता मराठीत नवी पिढी लिहू लागली आहे .तरी जुन्यांचा आठव होतोच .
           नाशिकचा पोवाडा लिहीणारे बी . डी . जाधव कामगार क्षेञात रमले . परिस्थितीचे ओझे खांद्यावर घेतलेला हा कलावंत साहित्याच्या प्रांतातून दूर गेला . अ. वा. वर्टी हे विनोदी कथाकार . नाशिकचा साहित्य मेळावा त्यांच्यामुळे हसरा , ताजातवाना असायचा .  माधव मनोहर हे समीक्षक . ते मुंबईत रमले . त्यांचा एक पाय नाशिकमध्ये होता .नाटकांची समीक्षा त्यांनी व्रतस्थपणे कली . वसंत नरहर फेणे यानी कथा आणि कादंबरीच्या क्षेञात मौलिक कामगिरी केली . त्यांची सेंट्रल बस स्टेशन ही नाशिकच्या सीबीएस वरच्या घडामोडी टिपणारी कादंबरी . शिवाजी तुपे हे चिञकार . नाशिकचा गंगाघाट , जुनं नाशिक ही त्यांच्या चिञांची समृध्दी . ते लिहीतही होते . लेखकात मिसळतही होते .चंद्रकांत वर्तक हे कथाकार . त्यांनी ललित लेखनही केले . साहित्य चर्चेत त्यांचे विचारमंथन सतत चालू असायचे . वळणावरचे साकव हा त्यांचा महत्वाचा कथासंग्रह . मो ग तपस्वी उत्तरायुष्यात नाशिकमध्येच स्थिरावले . पञकार असणारे तपस्वी नाशिकच्या सांस्कृतिक घडामोडीत सामिल होत .  बा वा दातार हे महत्वाचे व्यक्तीमत्व . विनोदी साहित्यावर संशोधन केलेल्या दातार सरांनी दोन तात्या हा ग्रंथ लिहीला .अभिनव भारताचे साक्षिदार असणा-या बा वा दातारांना तात्याराव सावरकर महत्वाचे वाटत होते आणि तात्यासाहेब शिरवाडकरही महत्वाचे वाटत होते . पसन्न निर्मळ माणूस असणारे दातारसरांची आजही आठवण होते .  पञकार सुरेश अवधूत यांनी भरारी , झेप असे स्तंभलेखन केले . संपादकांची मोठी परंपरा नाशिकमध्ये आहे . माधव गडकरी हे निफाडकर . काही काळ ते निफाडमध्ये रमलेही . त्यांचे लेखन विविधांगी होते . साहित्यातील माणिकमोती हे त्यांचे व्यक्तिचिञांचे पुस्तक . त्यांचे संपादकीय लेखनही ग्रंथबध्द झाले आहे . पञमहर्षी द . शं . पोतनीस , शशिकांत टेंभे या संपादकांनीही आपले योगदान दिले आहे . लेखकांना घडवणारे हे संपादक नाशिकच्या सांस्कृतिक विश्वाचे आधारवड होते . राजीव पाटील हा उमदा दिग्दर्शक . त्याचे जोगवा , सावरखेड एक गाव , सनईचौघडे हे महत्वाचे चिञपट होते . राजीव पाटीलची आई आशाताई पाटील या उत्तम वक्त्या , सूञसंचालक . त्यांचा मधला मुलगा प्रशांत पाटील हा अभिनेता . संस्कृतीची सेवा या कुटुंबाने केली .
             कवी आनंद जोर्वेकर हा उमदा कवी ." थोडे शब्द थोडी गाणी , हेच माझे अन्नपाणी " ही त्याची भूमिका होती . निजरूप हा त्याचा कविता संग्रह . पुढे त्याचा  " काहीलिचे पाणी " हा कवितांचा संग्रह आला . विशुध्द कविता आणि विशुध्द कवी म्हणजे आनंद जोर्वेकर तथा प्रमोद कुलकर्णी . त्याच पिढीतला पण वेगळया कुळातला कवी म्हणजे अरूण काळे .  राॅकगार्डन , सायरनचे शहर या कविता संग्रहानंतर त्याचा नंतर आलेले लोक हा संग्रह प्रसिध्द झाला . जागतिकीकरणानंतरची परीभाषा , लोकभाषा अरूण काळे यांनी मांडली . दलित कवितेला नवे परिमाण या कवीने दिले . उपेक्षित , शोषित , वंचित , दलित समाजाची कुतरओढ या कवीने मांडली . कैलास पगारे हा त्याचा समकालिन कवी . सर्व्हे हा त्याचा पहिला संग्रह साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानाने आला . त्या नंतर या ही मोसमात हा त्याचा संग्रह प्रसिध्द झाला . दीर्घ विरामानंतर त्याचा मल्टीनॅशनल वाॅर हा कविता संग्रह प्रसिध्द झाला . दलित कवितेच्या प्रवाहात त्याने समर्थपणे आपले योगदान दिले . त्याचा माणूसनामा हा संग्रह याच वर्षी प्रसिध्द झाला . अरूण काळे आणि कैलास पगारे यांनी मानवी मूल्यांसाठी कविता लिहीली . अक्षर सुधारण्यासाठी कुणी कविता लिहीत नसते ,ही या कविंची भूमिका होती . जयश्री पाठक ही कवयञी आणि कवीची सखी . कवितेचे विविध कार्यक्रम करणा-या जयश्री पाठक यांनी बालकविताही लिहिल्या . पण कवीला जगण्याला चाल लावता येत नाही हे अरूण काळेने सांगितलेले सूञ जयश्री पाठकांनाही लागू पडले .
             आज हे कवी , चिञकार , पञकार , नाटककार , नट , दिग्दर्शक आपल्यात नाहीत . पण साहित्य संस्कृतीची त्यांनी सेवा कली . काहींना दीर्घायुष्य लाभले . काहींची अचानक एक्झिट झाली . चटका लावणारं मरण काहींना अनुभवाला आले .ही माणसं लाखमोलाची होती म्हणून नव्या वर्षाला सामोरे जाताना त्यांचा आठव महत्वाचा ठरतो .