Sunday, 20 November 2016

                                     
                                   वकीलांचे साहित्य संमेलन होऊ द्या
                   कालपरवाची गोष्ट. अॅड दौलतराव घुमरे यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन होते . अडॅ घुमरे हे ज्येष्ठ   विधीज्ञ. वयाच्या नव्वदीत त्यांनी आपले अनुभव संचित शब्दबध्द केले . लाॅयर हे त्यांचे आत्मकथन . प्रकाशन समारंभास अॅड धैर्यशील   पाटील ,अॅड उज्वल  निकम , न्या साधना जाधव असे दिग्गज होते . मराठी साहित्याच्या अंगणात हे सारस्वताचे झाड वाढविणारी वकील मंडळीही आहेत आणि त्यांनी साहित्यसेवा करून आपले योगदान मराठी साहित्याला दिले असे म्हटले तर ते अयोग्य ठरणार नाही . वकीलाला  विविध कथांचा उलगडा होत असतो . डाॅक्टर माणसाचे वस्ञाविना शरीर पहात असतो . वकीलासमोर वस्ञाच्याआतील माणसाचे चरीञ आणि चारिञ्य येत असते . म्हणून वकीलाचे लेखन हे वास्तवाच्या पायावर उभे असते . मला वाटतं वकीलांनी मोठ्या संख्येने आपले अनुभव  लिहीले तर मोठ्या अक्षर वाऽमय निर्माण होऊ शकते . वकीलांना घटनांचे कितीतरी पदर माहित असतात . अजून मानवी जीवनाचे खरे रहस्य साहित्यातही पुरते अवतरले नाही .
              स्वातंञ्य चळवळीतले कितीतरी नेते कायद्याचे पदवीधर , द्वीपदवीधर होते . न्या महादेव गोविंद रानडे यांनी ग्रंथकार सभा भरवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेड रोवली .मराठी सत्तेचा उदय हा त्यांचा महत्वपूर्ण ग्रंथ . लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची शतपञे प्रसिध्द आहेत . ते कायदा क्षेञातच कार्यरत होते . बाळ गंगाधर टिळक हे वकीलीची परीक्षा पास होऊन भारतीय असंतोषाचे जनक ठरले . स्वातंञ्यवीर सावरकर हे ही बॅरिस्टर होऊन स्वातंञ्य लढ्याचे नेतृत्व करीत होते . मोहनदास करमचंद गांधी हे बॅरिस्टर होऊनच भारतात आले आणि स्वातंञ्य लढ्याचे नेतृत्व करू लागले . डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी कितीतरी खटल्यात बाजू मांडली . फाळणीपूर्व अखंड हिंदुस्थानचे नेते महमद अली जीना हे बॅरिस्टरच होते . यांनी चळवळीचे साधन म्हणून साहित्याकडे पाहीले .  लोकमान्य टिळक यांनी केसरी , मराठा या वृत्तपञातून अग्रलेख लिहून सरकारचे स्वरुप विस्तारण केले . मंडालेच्या तुरुंगात असताना " गीतारहस्य " हा ग्रंथ लिहीला .गांधीजींनी यंग इंडिया , हरिजन मधून लिहीले . डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक , बहिष्कृत भारत या पञांबरोबरच स्वतंञ ग्रंथसंपदाही निर्माण केली . पं जवाहरलाल नेहरू यांचा " भारताचा शोध " हा मूलभूत ग्रंथ ठरला . काॅग्रेसचे त्तकालिन नेते न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ हे प्रवासवर्णनकार म्हणूनही प्रसिध्द आहेत . ही सर्व मंडळी कायदा क्षेञातली होती . काहींनी वकीलीची सनद घेउनही वकीली केली नाही . डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी माञ बाह्मणेतर चळवळीतील जेधे-जवळकर , र.धो.कर्वे यांच्या खटल्यात वकीली केली . तरी त्यांच वैचारिक वाऽमयाच्या क्षेञातील स्थान अव्वल दर्जाचेच मानावे लागते . टिळक - आंबेडकर यांच्याशिवाय स्वातंञ्य लढयाचा आणि प्रबोधनाच्या चळवळीचा तसेच वाऽमयाचा इतिहास लिहीला जावू शकत नाही . स्वातंञ्यपूर्व काळातील वकीलांच्या साहित्याचे प्रयोजन स्वातंञ्य लढा , समाज परिवर्तन असे होते . ते साहित्य ललित आणि दलित असे दोन्ही नव्हते . चळवळीचे साधन होते . बी. सी. कांबळे यांनी त्याच न्यायाने डाॅ आंबेडकरांचे चरीञ खंड लिहीले . आधुनिक मराठी साहित्याचा हा पूर्वकाळ होता .  
                    खरं तर तज्ञ वकीलांनी केलेले लेखन हे कायदा क्षेञाविषयी आणि इंग्रजी या भाषिक माध्यमातून . या पुस्तकांची मराठी भाषांतरेही झाली . त्यांना विविध मानसन्मानही मिळाले . वुई दी पिपल हे न्या छगलांचे पुस्तक महत्वपूर्ण ठरते. कायदा क्षेञात वकील , न्यायधीश यांनी साहित्याच्या क्षेञात महत्वपूर्ण भर घातली आहे  कायद्याचा.अन्वयार्थ स्पष्ट करणारी , एखाद्या वेगळया केसचा पैलू स्पष्ट करणारी आंग्ल भाषेतील ही पुस्तके रूपांतरित होऊन मराठीत आली आहेत . अलिकडील भास्करराव आव्हाड , काका घुगे , दौलतराव घुमरे यांची ग्रंथ संपदा हे याचे उदाहरण ठरावे .सातारच्या धैर्यशील पाटलांच्या " ओल्ड वर्ल्ड , न्यू होरायझन्स  " या पुस्तकाला नेहरू पारितोषिकही मिळाले आहे . मिस रूल ऑफ लाॅ ,मिस युज ऑफ लाॅ , ही काका घुगे यांची पुस्तके प्रसिध्द आहेत . भास्करराव आव्हाड यांचे वैदीक न्यायशास्ञावरील पुस्तक मराठीत आले आहे .
                   आधुनिक मराठी साहित्यात भाऊसाहेब पाटणकरांच्या गझला प्रसिध्द आहेत . पुन्हा एकदा हा धैर्यशील पाटील यांच कविता संग्रह तर दलित कवी अशोक बनसोडे यांचा माझ्या बापाचा बाप संग्रह वकील कवीही आहेत याचा पुरावा मानावा लागतो . शंकरराव खरातांचे तराळ अंतराळ हे आत्मकथन प्रसिध्द आहे . कथाकार , कादंबरीकार असणा-या शंकरराव खरातांनी जळगावच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही भूषविले आहे . बाबा कदम हे  लोकप्रिय कादंबरीकार . वाचनालयात त्यांच्या कादंब-या वाचनासाठी प्रतिक्षायादी असायची . ते ही वकीलांचेच प्रतिनिधी . बाळासाहेब भारदे हे विधानसभेचे सभापती असले तरी संत साहित्यावर त्यांनी ग्रंथ लेखनही केले आहे . रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष पद भषविलेल्या रावसाहेब शिंदे यांचे ध्यासपर्व हे आत्मकथन . त्यांनी भावलेली माणसं या शीर्षकाने व्यक्तीचिञेही लिहीलेली आहेत . त्यांच्या पञलेखनाचे संवाद पर्व खंडात्मक रुपात प्रसिध्द आहे . काकासाहेब कालेलकरांनंतर प्रवास वर्णन लिहीणारे लेखक भास्करराव आव्हाड . त्यांची क्षितिजापार , कोलंबसाचा मागोवा , शोध कांगारूंचा ही प्रवास वर्णने पसिध्द आहेत . त्यांनी प्रसंगाप्रसंगाने लिहीलेल्या स्फुट लेखनातून पंचनामा , विविधा -एक, दोन असे संग्रह पसिध्द झाले आहेत . मरूद्यान , उद्यानविश्व असे कविता संग्रह लिहीणारे ज्येष्ठ विधिज्ञ आव्हाड महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्थ मंडळाचे अध्यक्षही आहे.
                     वकीलांची ज्येष्ठ पिढी आज व्यवसायातून बाहेर पडत असताना आठवणी , अनुभवकथन , आत्मकथा लिहीत आहे .  गंगाजल  - अॅड खुटाडे , जमनादास आहुजा - पंख नियतीचे, माझ्याचसाठी जन्मलो न मी - सुदाम भागुजी ( दाजी ) सांगळे यांनी आपल्या आत्मकथा लिहून प्रसिध्द केल्या आहेत . नव्या पिढीला या आत्मानुभवातून बोध होतो . वकीलीचा व्यवसाय तरुण वयात वाट पहायला लावणारा तर वय वाढत असताना कामाचा व्याप वाढवणारा . वकीलाला सेवानिवृत्ती नसते . म्हणून नव्वदीतही कोर्टात लक्ष घालणारे वकील सापडतात . त्यातल्या काहींनी आता हे अनुभवसंचित शब्दबध्द करायला सुरुवात केली आहे . मराठी साहित्य समृध्दीला वकीलांचाही हातभार लागतो आहे , हे सुचिन्ह . आता वकीलांचे साहित्य संमेलन व्हावे , असे म्हटल्यास ते फार कल्पनाविलासाचे ठरणार नाही .
                                                                            प्रा डाॅ शंकर बो-हाडे
                                                                             9226573791

         

                                      बहुभाषिक संमेलन घुमान ( पंजाब )

            बहुभाषिक साहित्य संमेलन पंजाब प्रांतातल्या घुमान येथे सुरू झाले आहे . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ही उपलब्धी मानावी लागेल . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने उत्सवी होऊ लागली आहेत . हा उत्सव काळानुरूप आणि आयोजक संस्थेच्या ताकदी नुसार अधिकाधिक हायटेक होऊ लागला आहे .पिंप्री चिंचवडचे संमेलन हे त्याचे ताजे उदाहरण . सरहदने आठ्ठयाऐशीवे संमेलन यशस्वी करून  दाखविले . ते घुमानला घेण्यातले औचित्यही मांडले . पंजाब- महाराष्ट्रातला अनुबंध स्पष्ट झाला . संमेलनाध्यक्षांनी तर " पुंडलिक वरदा हरी विठ्ठल " या वचनाचा विस्तार " ज्ञानदेव नामदेव तुकाराम " असा केला . डाॅ सदानंद मोरे यांचे घुमानचे अध्यक्षीय भाषण मराठे आणि शीख यांचा अनुबंध स्पष्ट करणारे होते . भक्ती आणि शौर्य याची मांडणी त्यांनी केली होती , पण उत्सवीपणाच्या झगमगाटात ते भाषण दुर्लक्षित राहीले . तरी या संमेलनाने भाषिक संस्कृतीला नवा आयाम दिला .
              साहित्य संमेलने आणि वाद काही नवे नाही . बहुभाषिक साहित्य संमेलन आतापर्यंत त्यापासून दूर आहे . कारण हे संमेलन उत्सवी नाही . भाषिक आदान प्रदान , भाषासंवर्धन आणि अनुवाद रुपांतर , भाषिकसबंध यावर चर्चा होणार आहे . मागच्या वेळी महाराष्ट्रातून खास दोन रेल्वेने महाराष्ट्रीय मडळी गेली होती . यावेळी लवाजमा घेऊन कुणी जाणार नाही . महाराष्ट्रातील निवडक मडळी या दोन दिवसाच्या संमेलनात सहभागी होत आहेत .भारत देसरडा , संजय नहार यांचे बरोबरच कथाकार राजन खान निमंञक आहेत . तर अरुण नेवासकर स्वागताध्यक्ष आहेत . अरुण नेवासकरांनी घुमानच्या संमेलनासाठी मोठे योगदान दिले होते . हे संमेलन यशस्वी व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत . कार्यक्रम पञिकेत माध्यमातील मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत .विजय कुवळेकर , राजीव खांडेकर , सुरूश भटेवरा , विजय बाविस्कर , महेश म्हाञे , सुनिल चावके यांचे बरोबरच पियुष नासिककर हा युवा पञकार कवी संमेलनात रामदास फुटाणेंसोबत मराठी कवींचे प्रतिनिधित्व करणार आहे . अरूण जाखडे हे प्रकाशकांचे प्रतिनिधी असले तरी त्यांनी स्वतंञ लेखन संपादनही केले आहे . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष वसंत आबाजी डहाके आणि डाॅसदानंद मोरे या संमेलनात सञाध्यक्षाच्या भूमिकेत आहे .श्रीपाल सबनीसांचीही सञाध्यक्ष म्हणूनही संमेलनात दखल घेतली गेली आहे . गोव्याचे कवी विष्णु सुर्या गुंजाळ , शिरीष नाईक हे अन्य मराठी वक्तेही सहभागी होणार आहेत .
            गणेश देवी या संमेलनाचे अध्यक्ष आहेत . त्यांचे भाषेच्या क्षेञातले काम महत्वाचे आहे . घुमानच्या संमेलनातील त्यांची मुलाखत महत्वपूर्ण होती . भाषाविषयक महत्वपूर्ण कामगिरी करणारा भाषातज्ञ या संमेलनात बोलणार असल्याने या छोटेखाणी संमेलनात महत्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे . भाषिक आदानप्रदान मोठ्या प्रमाणावर घडत आहे . कोणतीच भाषा प्रदुषणापासून मुक्त नाही . मराठीतले कितीतरी शब्द अन्य भाषेत स्थिरावले आहेत . बाई आणि आई हे शब्द गुरुवाणीत असल्याचे डाॅ सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातच सप्रमाण सिध्द केले आहे . काही मराठी शब्दांनी तर थेट ऑक्सफर्ड डिक्शनरीत स्थान  मिळविले आहे . आज आपण बोलतो ती मराठी भाषाही आदानाने समृध्द झाली आहे . तंञज्ञानाने नवनवीन शोध लागत असून नव्या उपकरणासाठी परभाषेतून आलेला शब्द योजवा लागतो .तो भाषा स्वीकारतेसुध्दा .अशा भाषिक घुसळणीच्या काळात हे संमेलन होत आहे . साने गुरूजींची अंतरभारतीची कल्पना या संमेलनात दिसेल अशी आशा वाटते .
               पंजाबमध्ये घुमानला होणा-या बहुभाषिक संमेलनात भाषा भगिनींची चर्चा होईलच पण या निमित्ताने तिथे पुढील काळात बहुभाषेच्या अभ्यासासाठी भाषाभवन उभारण्याची कल्पना पुढे आली आहे . भाषाविषयक संशोधनही त्यातून व्हावे अशी अपेक्षा आहे . भाषांतर , अनुवादाच्या क्षेञात साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकानेही कोकणात काम सुरू केले आहे . ते देशपातळीवर घडण्याची चिन्हे घुमानला दिसत आहे . हे संमेलन प्रत्येक वर्षी घुमानला होणार आहे . संत नामदेवांमुळे घुमान पुण्यमूमी , तिर्थक्षेञ म्हणून परिचित होते . आता ते भाषा संवर्धन , संशोधनाचे केंद्र बनत आहे . महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीतून हा उपक्रम फळावा , फुलावा आणि मराठीचा झेंडा असाच फडकत रहावा , अशी अपेक्षा करू या .
                                                       

                                             डाॅ शंकर बो-हाडे
                                             9226573791
युवा वाईन लेडी - श्रध्दा मोरे जागतिक स्तरावर लाईफटाईम जज
================%=======================

                  1980चे दशक नाशिक जिल्हयासाठी विशेष दशक मानावे लागते . शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहीजे यासाठी अभूतपूर्व आंदोलन सुरू झाले . या उग्र आंदोलनाचे पडसाद भारतभर उमटले .शरद जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून माधव खंडेराव मोरे लढत होते . त्यांच्या बरोबर प्रल्हाद पाटील कराड , निफाड सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअसमन माधवराव बोरस्ते होते . पैकी माधव खंडेराव मोरे यांनी शेतक-यांसाठी आंदोलनाबरोबरच विविध प्रयोग केले . एकदा ते नारायणगावला  वाइन कंपनीला भेट देण्यासाठी गेले . कंपनीने भेट नाकारताच नाना कडाडले , " तुम्ही काय अॅटमबाॅम्ब तयार करीत आहात का  ? एक दिवस  व्यापारी माझ्या बांधावर वाइनची द्राक्ष खरेदी करायला येईल , तेंव्हा बांधाबांधावर वायनरी उभ्या दिसतील . "  मोरे यांनी प्रथम द्राक्ष निर्यात करणारी कंपनी सुरु केली . त्यासाठी ख्रिस्तोफर या इंग्लंडच्या व्यापा-याकडून रितसर माहिती करुन घेतली . पुढील काळात  त्यांनी पिंपेन इंडिया लि. ही कंपनी स्थापन केली . पिंपेन हा या शेतकरी नेत्याचा ड्रीम प्रोजेक्ट होता . 1988 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीला दीर्घायुष्य लाभले नाही . पुढे 1992 मध्ये महाग्रेपची स्थापना माधव खंडेराव मोरे यांनी केली . महाग्रेप हे द्राक्ष उत्पादकांचे व्यासपीठ ठरले . नाना महाग्रेप मधून बाहेर पडले .पिंपेनलाही यश मिळाले नाही . पण नानांचे स्वप्न आणि शब्द नाशिक जिल्हयात शब्दशः खरे ठरले आहेत . विंचूरला वाईन पार्क उभा राहिला आहे .  शॅपेन हे नाव गावावरून पडले . तसेच नाव पिपेन दिले गेले . पिंपळगावची सुरा म्हणून पिंपेन . विचुरची सुरा विंचुरा .विंचूरची विंचूरा , सुला या वाईन जगाच्या मार्केटमध्ये पोहचल्या आहेत . पिंपेन सुला वाईनने  टेक ओव्हर केली  .माधव खंडेराव मोरे यांनी वाईन पार्क मधला प्रोजेक्ट पिंपळगावला आपल्या बांधावर नेला .  त्यांच्या सूनबाई सौ सुनंदा विश्वास मोरे या  सायलो वाईनचे प्राॅडक्शनचे काम सांभाळीत असून त्या नाशिकच्या वाईनलेडी ठरल्या आहेत .तर नानांची  नात श्रध्दा विश्वास मोरे या इंग्लंडमधले शिक्षण संपवून फ्रान्समध्ये पुढील शिक्षणासाठी गेली असून वाईनच्या जागतिक स्पर्धेसाठी जज म्हणून नियुक्त झाली आहे , एक मराठी मुलगी जागतिक स्पर्धेसाठी जज म्हणून निवडली जाणे हेच एक कौतुक आहे. पुण्याच्या गरवारे महाविद्यालयातून बी एस्सी ( बायोटेक )पदवी संपादन करणा-या श्रध्दा हिने वाईन उद्योगात करियर करण्याचा निर्णय घेतला असून आता तिने लाईफटाईम जज म्हणून मान्यता मिळविली आहे . फ्रान्स सरकारच्या Effervescence du Monde  या संस्थेच्य वतीने वाईनचे  जागतिक मानांकन करण्यासाठी परीक्षा घेतली जाते . या परीक्षेसाठी जगभरातून तज्ञ व्यक्ती सहभागी होतात . या स्पर्धेत पिंपळगावच्या भूमिकन्येने बाजी मारली आहे . सौ सुनंदा मोरे या श्रध्दाच्या आई . पिंपळगावला त्या मोरे यांच्या सायलो वाईनचे प्राॅडक्शन सांभाळतात . सुनंदा मोरे या उद्योगाशी विवाहानंतर जोडल्या गेल्या . सुनंदा मोरे यांचा विश्वास मोरे यांचेशी प्रेमविवाह झाला तरी त्या काही बंडखोर नव्हत्या. नात्याचा विचार करता नातं विवाहाला मान्यता देणारच होतं. मामाचीच मुलगी आणि ती ही बालमैञिण असल्याने विवाहाला अडचण नव्हती . विश्वास मोरे यांनी बायकोला आधीच सांगितले होते , " दोन मुलींनंतर आपण थांबायचे ." स्ञी जन्माचे स्वागत करा असे त्यांना कुणी सांगितले नव्हते .सौ. सुनंदा  बी ए झाल्या आहेत . लग्नानंतर त्यांनी या उद्योगात लक्ष घातले . प्रत्यक्ष शेतीतला अनुभव नसताना त्या शेती पाहू लागल्या . माधव खंडेराव मोरे यांनी द्राक्षासाठी महाग्रेप हे व्यासपीठ निर्माण केले . विंचूरला वाईनपार्क उभा करण्यासाठी प्रयत्न केला . एका स्वप्नाचा  पाठपुरावा करण्याचा माधवराव नाना यांचा प्रयत्न होता . त्याच वेळी विश्वास मोरे वसौ सुनंदा हे स्वतःचे प्राॅडक्ट डेव्हलप करीत होते . वाईन उद्योगाचा अभ्यास मोरे कुटूंबाने सुरू केल होता .सायलो हे नाव मुलीच्या नावावरुन ठरले . त्यांची कन्या सायली ही आज सी ए करते आहे . उत्तम चिजकार असणा-या सायलीच्या नावाचा ब्रॅड प्रसिध्द होऊ लागला आहे . बाराहजार लिटरची टाकी तयार झाली . वाईनचे उत्पादन सुरू झाल्यावर त्याचे ब्रॅडीगही करावे लागले . सायलो वाईनचे उत्पादन आज सिक्कीम भूतानपर्यंत गेले आहे . सायलो वाईनचे मदर युनिट पिंपळगाव ( ब ) मध्ये असले तरी त्याचा विस्तार सिक्कीम, भूतानपर्यंत पोहचला आहे . पुढील काळात हाॅगकाॅग शहरापर्यंत विस्तार करण्याचे नियोजन चालू आहे .  1998 साली वाईन पार्क सुरू झाला . विंचूराचे नाव सर्वदूर पोहचत असताना सायलोचे उत्पादन आस्ते पण दमदार वाटचाल करीत आहे . श्रध्दा विश्वास मोरे थेट इंग्लंडमध्ये वाईन उत्पादनाचे धडे घेऊन फ्रान्स मध्ये पोहचली आहे .तिथे माॅटपेले शहरातील गायझनहॅम विद्यापीठाच्या वेटीसी वेनेफेरा महाविद्यालयात शिकत असताना तिने EmaVE  ही मानाची शिष्यवृत्ती मिळवली असून जगातील साठ देशातील शॅपेंन उत्पादकांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत ती जज म्हणून निवडली गेली आहे . भारतातील पहिली व एकमेव जज असणारी श्रध्दा आता या उद्योगातील नाविन्यपूर्ण घडामोडी आपल्या उत्पादनासाठी कळवित असते . आता ती जगभर या उत्पादनात व उद्योगात चालणा-या घडामोडी टिपत आहे . एक खासा मराठा समाजातील ही कन्या क्रांतीकारक शेतकरी कुटूंबात वाढली . आता ती वाईन व शॅपेन उद्योगाच्या घडामोडींची साक्षीदार  व लाईफ टाईम जज झाली आहे .
                  वाईन उद्योगासमोर आज विविध समस्या व आव्हाने आहेत . वाईन पार्क सुरू झाला तेंव्हा एक्कावन्न परवाने देण्यात आली . आज त्यातल्या काही वायनरी बंद पडल्या आहेत . काहींनी आक्रमक मार्केटींग केले . काही झगडत आहेत .कारण भारतात वाईन उत्पादनाच्या बाबतीत राज्यस्तरावर शासनाची भूमिका वेगवेगळया राज्यात वेगवेगळी आहे .केंद्रस्तरावर धोरण नसल्याने शासनाच्या नियम अटींचा फटका  उत्पादकांना बसतो आहे .              
               शेतकरी संघटनेचे नेते माधव खंडेराव मोरे यांनी शेतक-याच्या बांधावर वाईनरीचे स्वप्न पाहीले आणि ते प्रत्यक्षात आले . सौ. सुनंदा व विश्वास मोरे यांनी त्या स्वप्नाचे प्रात्यक्षिक करून सिक्कीम, दार्जिलींग  पर्यंत त्याचा विस्तार केला तर त्यांची कन्या या क्षेञातील लाईफ टाईम जज म्हणून जगभर पोहचली आहे . तिला उद्या सर्वचजण वाईनलेडी म्हणूनच ओळखतील अशी दमदार वाटचाल श्रध्दा   विश्वास मोरे हिची सुरू आहे . ती बाईपणाच्या बुरख्यातून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करीत आहे .                
                                                                        प्रा डाॅ शंकर बो-हाडे
                                                                         9226573791

अस्मितादर्शचे जागरण
अस्मितादर्श  हे केवळ वाऽमयीन मासिक नाही तर ती एक समाजशील साहित्याची चळवळ आहे . दलित चळवळीत अस्मिता हे मूल्य आहे . म्हणून अस्मिता या नावाने पहिले तीन अंक प्रसिध्द झाल्यावर 1968 साली अस्मितादर्शचा पहिला दिवाळी अंक प्रसिध्द झाला . डाॅ गंगाधर पानतावणे हे त्याचे संपादक आणि संचालक . डाॅ पानतावणे यांनी आयुष्यभर आंबेडकरी विचार विश्वाचे संगोपण , संवर्धन   हेच आपले जीवन ध्येय मानून वाटचाल केली . त्यांनी केलेले डाॅ आंबेडकरांच्या पञकारीतेचे संशोधन संपादन मराठी साहित्य व पञकारीतेच्या इतिहासाला नवे वळण देणारे ठरले . बाबासाहेबांच्या शब्दशस्ञाचा वेध डाॅ पानतावणे यांनीच घेतला . त्यासाठी अस्मितादर्श या विचारपीठाचा त्यांनी नेमका उपयोग करून घेतला . अस्मितादर्शच्या प्रकाशनाबरोबरच अस्मितादर्श साहित्य संमेलन ही त्यांची देण .
                                   
 1968 च्या पहिल्या अंकात मोरेश्वर वहाणे , दया पवार ,वामन निंबाळकर , अर्जन डांगळे . केशव मेश्राम, फ.मु शिंदे , शिवराम देवलकर , यशवंत मनोहर , निलकांत चव्हाण , भ मा परसवाळे , वसंत दत्ताञेय गुर्जर , तुलसी परब , सतिश काळसेकर , चंद्रकांत खोत , शरद साटम , प्र श्री नेरुरकर यांच्या कविता होत्या .शंकरराव खरातांची आडातलं भूत , ,बाबुराव बागुल यांची पान , रा रं बोराडे यांची पान्हा या कथा होत्या. हे सर्वच लेखक पुढील काळात मराठीतले नामवंत लेखक ठरले . शंकरराव खरात , केशव मेश्राम , फ. मु शिंदे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले . बाबुराव बागुलांना जनस्थान पुरस्कारासह विविध मानसन्मान मिळाले . ही एखाद्या वाऽमयीन नियतकालिकाची ऐतिहासिक कामगिरी मानावी लागेल .1974च्या पारंभी जानेवारीत पहिले अस्मितादर्श साहित्य समेलन झाले . औरंगाबादला झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन प्राचार्य म.भि. चिटणीस यांनी केले होते . पहिले संमेलन अध्यक्षांशिवाय झाले तरी पुढील एकतीस संमेलनांना अध्यक्ष नियुक्त करुन संमेलने पार पडली . दलित , परिवर्तनवादी विचारांच्या अध्यक्षांची निवड हे या संमेलनाचे यश .शामराव कदम , कुमुद पावडे , जनार्दन वाघमारे ,  वसंत मून , दया पवार , नामदेव ढसाळ , भालचंद्र फडके , निर्मलकुमार फडकुले , लक्ष्मण माने , रा.ग.जाधव , मा.प.मंगुडकर ,, ज्योती लांजेवार , भास्कर चंदनशीव ही नावंच विचार व्युह स्पष्ट करणारी आहेत . गं. बा . सरदार , कुसुमाग्रज, डाॅ ऐलिनाॅर झेलियट , ग.प्र.प्रधान , सुरेश द्वादशीवार , मधु मंगेश कर्णिक , ना.धो.महानोर यांची संमेलनातली भूमिका व उपस्थिती लक्षणीय ठरते .
दलित साहित्याचा आणि आंबेडकरी विचाराचा व्यापक पट मांडणारी ही संमेलने महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरात तर झालीच तसेच महाराष्ट्राबाहेर इंदूर सारख्या शहरातही झाली . एकतीसावे संमेलन जळगावात झाले तर या वर्षी ते वाशिमला भरले . नांदेडचे रविचंद्र हडसनकर हे त्याचे अध्यक्ष होते . एक कवी , कथाकाराचा सन्मान या निमित्ताने झाला .
            अस्मितादर्शने सातत्याने विविध विषयावर चर्चा घडवून आणली . समकालीन विषयावर संवाद घडवून आणला . दलित स्ञी आत्मकथने , दलित कथा, दलित रंगभूमी,दलित शाहिरी अशा विषयावर विशेषांक प्रसिध्द करणा-या या नियतकालिकाने शंकरराव खरात , भालचंद्र फडके , बाबुराव बागुल,केशव मेश्राम यांचा सन्मान करणारे विशेषांकही प्रसिध्द केले . एखादे साहित्य चळवळ व प्रवाहाला वाहिलेले नियतकालिक पावणेपाच दशके चालते हा विक्रमच म्हणावा लागेल . आज साहित्य संशोधन करणा-या संशोधक विद्यार्थ्याना अस्मितादर्शने कितीतरी संदर्भ उपलब्ध करून दिले आहेत . ते केवळ वाऽमयीन नियतकालिक नाही तर समकालिन सामाजिक चळवळीचे केंद्र आहे . या केंद्राने कितीतरी लेखक , कवी घडविले आहेत .
            साहित्य संमेलने खर्चिक होत असताना अस्मितादर्श संमेलने तुटपुंज्या आर्थिक समाजबळावर होत असतात . वादविवादापेक्षा संवादावर भर असणारी ही संमेलने नवसांस्कृतिक भूमिका पार पाडीत आहेत . दलित उत्थानाची जबाबदारी पार पाडीत आहे .उपेक्षित जनसमुहाची स्पंदने टिपत आहेत . जागतिकीकरणाने चळवळी शबल होत असताना डाॅ गंगाधर पानतावणे यांनी विचारांचे जागरण चालविले आहे . दलित , परिवर्तनवादी लेखकाची तिसरी - चौथी पिढी सक्रीय ठेवण्याचे काम या नियतकालिकाने केले आहे . डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाची तयारी चालू आहे .दुसरीकडे रोहित वेमुलाची हत्या , जेएनयुचे प्रकरण चळवळीच्या दृष्टिने आव्हान ठरते आहे . दलितांचे प्रश्न गुंतागुंतीचे होत आहे . या काळात अस्मितादर्श सारखी चळवळीची साधने महत्वाची भूमिका बजावत आहेत . वाशिमला असेच विचारमंथन रविचंद्र हडसनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले . साहित्य संस्कृतीच्या दृष्टिने ही फार महत्वाची घटन मला वाटते.
                                                                    डाॅ शंकर बो-हाडे
                                                                     9226573791